नारंगवाडी/ विठ्ठल चिकुंद्रे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी कवठा येथील मंगल कार्यालयात महिलांचा गौरव आणि प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी उपस्थित राहून ग्रामीण भागातील महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती आणि सन्मान
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रभावती अनुरथ सोनवणे होत्या. यावेळी व्यासपीठावर सौ. विजयाबाई माणिकराव देशमुख, पंचायत समिती सदस्या श्रीमती रुक्मिणबाई देविदास कांबळे, सुप्रसिद्ध उद्योजिका सौ. प्रितमताई जाधव, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वैशालीताई लोंढे, प्रा. डॉ. सारिका दायमा, ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल दादासाहेब कांबळे, माजी पंचायत समिती सभापती सौ. शोभा बलभीम पोतदार, सौ. अक्षराबाई विजयकुमार सोनवणे आणि आरोग्य अधिकारी सौ. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: शिक्षण, उद्योग आणि आरोग्य
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कु. शौर्या सावंत हिने प्रास्ताविक केले, तर कै. किशनराव पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शिक्षण आणि पर्यावरण: ॲड. वैशालीताई लोंढे यांनी पर्यावरण रक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. दिशा प्रतिष्ठान, लातूरच्या माध्यमातून गुणवंत मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महिला उद्योजकता: 'सुणरणीचे लोणचे' ब्रँडच्या सर्वेसर्वा सौ. प्रितमताई जाधव यांनी महिलांना उद्योजक बनण्याचे आवाहन केले. गावातील गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी जाहीर केले.
आरोग्य सुविधा: आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी कवठा गावात अद्ययावत वैद्यकीय साधने उपलब्ध झाल्यास २४ तास प्रसूती व इतर आरोग्य सेवा पुरवण्याचा मानस व्यक्त केला.
योगाभ्यास व शिक्षण: प्रा. डॉ. सारिका दायमा यांनी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवले, तर शिक्षिका सौ. ज्योती आमले यांनी गावातील बदलत्या शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दयानंद विद्यालय आणि कै. किशनराव पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत उत्कृष्ट समूह नृत्य सादर केले. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
गावकऱ्यांचे सहकार्य
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील युवक आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले. मुख्याध्यापक पितांबर कांबळे सर, विजयकुमार सोनवणे सर आणि सत्यपाल भंडारे सर यांनी विद्यार्थिनी व शिक्षिकांच्या सहभागासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे भविष्यात महिला व मुलींना प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास सहभागी महिलांनी व्यक्त केला.
0 Comments