तुळजापूर | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धार्मिक नगरी तुळजापूर येथील वेताळ नगर भागात प्रस्तावित असलेल्या श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून वारंवार होणारी टाळाटाळ आणि प्रत्यक्ष कारवाईत येणारे अडथळे याविरोधात सकल नाभिक समाज, तुळजापूर यांच्या वतीने आज कडक लाक्षणिक उपोषण करण्यात आले. समाजाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
४० वर्षांची प्रतीक्षा आणि निधीचा प्रश्न
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गेल्या ४० वर्षांपासून समाजातर्फे हक्काच्या सांस्कृतिक सभागृहाची मागणी होत होती. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पुढाकारातून आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून या सभागृहासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र, नियोजित जागेवर शेजारील काही नागरिकांनी केलेल्या वर्षानुवर्षांच्या अतिक्रमणामुळे मूळ आराखड्याप्रमाणे बांधकाम करण्यास अडथळे येत आहेत.
व्यावसायिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा: सलून दुकाने राहिली बंद
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तुळजापूर शहरातील सर्व नाभिक बांधवांनी आपले व्यवसाय आणि सलून दुकाने एक दिवस पूर्णपणे बंद ठेवून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. "हक्काची जागा मिळेपर्यंत माघार नाही," असा ठाम निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला.
प्रशासनाची धाव आणि नगराध्यक्षांची मध्यस्थी
आंदोलनाची तीव्रता पाहून नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी तातडीने उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक औदुंबर कदम, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, विशाल रोचकरी, किशोर साठे, रत्नदीप भोसले यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
नियोजित जागेवरील अतिक्रमण येत्या दोन दिवसात पोलीस संरक्षणात हटवणार
--नगराध्यक्ष विनोद (पिटू भैय्या) गंगणे
"शहरातील या नियोजित जागेवरील अतिक्रमण येत्या दोन दिवसांत पोलीस संरक्षणात हटवले जाईल. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत," असे आश्वासन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिले.
नगराध्यक्षांच्या लेखी व तोंडी आश्वासनानंतर समाजबांधवांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी दिनेश क्षीरसागर, पंडितराव जगदाळे, अमर हंगरगेकर, सागर कदम, अनंत सावंत, नरेश अमृतराव, आनंद कंदले, राजेश्वर कदम, श्री गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
आता सर्वांचे लक्ष पालिकेच्या दोन दिवसांतील 'बुलडोझर' कारवाईकडे लागले आहे.
0 Comments