"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वीच तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०१ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी सकाळी १०:०० वाजता पंचायत समिती तुळजापूर येथे हे उपोषण होणार आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, तहसीलदार तुळजापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर आणि पोलीस उपअधीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे.
मुद्दा काय आहे?
तामलवाडी येथील कंपन्याद्वारे होणाऱ्या ग्रामपंचायत कर चुकवेगिरीबाबत सावंत यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आवाज उठवला आहे. प्रशासनाची कर वसुली करणे ही प्रमुख जबाबदारी असताना, प्रशासकीय अधिकारी काम करण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकाच विषयावर मागील तीन वर्षांत तीन गटविकास अधिकारी बदलले गेले, तरीही कामात काही प्रगती झालेली नाही. यामुळे “अधिकारीवर्ग कर चुकवेगिरीस खतपाणी घालत आहेत का?” अशी शंका तालुक्यात दबक्या आवाजात चर्चिला जात आहे.
आठवे आंदोलन
हे सावंत यांचे कर वसुली संदर्भातील आठवे आंदोलन आहे (यापूर्वी आत्मदहन आंदोलनासह इतर आंदोलने केली आहेत). त्यामुळे या प्रकरणाकडे तामलवाडी परिसरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
सावंत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना स्पष्ट सवाल केला आहे की, “प्रशासन कर वसुली का करत नाही? का अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करत आहेत?”
माजी सैनिक असलेल्या सावंत यांच्या या लढ्याकडे आता जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
0 Comments