Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सोलापूर-धाराशिव सीमा रस्ता मोजणीचा तिढा सुटला! शिवसैनिकांच्या मुंबईतील धडकेनंतर २ जुलैला पोलीस बंदोबस्तात होणार मोजणी

'Only न्युज धाराशिव'वृत्तसेवा 
काटी | विशेष प्रतिनिधी
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवरील मौजे शेळगाव (आर) येथील अत्यंत क्लिष्ट आणि दीर्घकाळापासून रखडलेला रस्ता मोजणी व सीमा निश्चितीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बार्शीतील शिवसैनिकांनी थेट मुंबईत धडक देऊन केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे येत्या २ जुलै २०२६ रोजी चोख पोलीस संरक्षणात ही शासकीय मोजणी प्रत्यक्ष पार पडणार आहे.

कायदेशीर पेच आणि दोन खंडपीठांचे अधिकार क्षेत्र
मोजणीचे ठिकाण हे शेळगाव (आर) व वाणेवाडी येथील शिव पानंद रस्ता (बसवेश्वर चौक दक्षिण बाजू, गट क्र. २८१ व २८२) येथे आहे. हे ठिकाण सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर येत असल्याने तसेच येथे दोन स्वतंत्र उच्च न्यायालयीन खंडपीठांचे अधिकार क्षेत्र येत असल्याने, अत्यंत जटिल कायदेशीर पेच निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंच्या वेगवेगळ्या सीमांमुळे कायदेशीर तांत्रिक अडचणी निर्माण होऊन ही मोजणी दीर्घकाळापासून प्रलंबित होती.

अल्पभूधारक महिला शेतकऱ्याचा लढा आणि शिवसैनिकांची साथ
या भागातील अल्पभूधारक महिला शेतकरी सौ. वैशाली दयानंद बादगुडे यांनी आपल्या न्याय्य हक्काच्या रस्त्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सार्वजनिक हितासाठी हा कायदेशीर लढा सुरू केला होता. या लढ्याला बार्शीतील प्रसिद्ध विधिज्ञ व शिवसैनिक ॲड. सुरेशजी बापू गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी खंबीर पाठबळ दिले आणि हा लोकहितार्थ विषय थेट राज्याच्या राजकीय पटलावर नेण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत धडक आणि खा. संजय राऊत यांचा तात्काळ आदेश
२४ जून २०२६ रोजी ॲड. सुरेशजी बापू गायकवाड व सहकारी शिवसैनिकांनी मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार माननीय संजयजी राऊत साहेब यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शिवसैनिकांची व शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेताच खासदार संजय राऊत यांनी तत्परता दाखवत थेट मुंबईतूनच भूमी अभिलेख विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून कडक निर्देश दिले.

प्रशासकीय यंत्रणा हलली; २ जुलै ही तारीख निश्चित
खासदार राऊत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली. उपअधीक्षक भूमी अभिलेख, बार्शी कार्यालयाने तात्काळ अधिकृत आदेश (जावक क्र. २३४८/२६) जारी करून दिनांक ०२/०७/२०२६ रोजी जागेवर शासकीय हद्द कायम करण्यासाठी मोजणी व सीमा निश्चितीची अंतिम तारीख जाहीर केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेसाठी विनामूल्य पोलीस बंदोबस्त
मोजणीच्या ठिकाणी दोन जिल्ह्यांची सीमा असल्याने आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासकीय कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सोलापूर यांना पत्र लिहून मोजणीच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच, शासकीय धोरणानुसार महिला अर्जदारांना विनामूल्य स्त्री पोलीस बंदोबस्त पुरविण्याची तरतूद असल्याने, सौ. वैशाली बादगुडे यांना विनामूल्य पोलीस संरक्षण मिळणार आहे.

ॲड. सुरेशजी बापू गायकवाड यांच्या खंबीर नेतृत्वामुळे, शिवसैनिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि खासदार संजय राऊत यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे हा कठीण प्रश्न सुटल्याबद्दल सौ. वैशाली बादगुडे व परिसरातील शेतकऱ्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments