Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भटके विमुक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध व्हा! 'एकलव्य विद्या संकुला'त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा द्विदिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न; तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
भटके विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि संस्थेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी कार्यकर्त्यांची व कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन भटके विमुक्त विकास परिषदेचे संघटन मंत्री राहुल चव्हाण यांनी केले.

भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा (एकलव्य विद्या संकुल, यमगरवाडी) येथील शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय विशेष अभ्यास व प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या सदस्या तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रणिता गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध सत्रांतून तज्ज्ञांची अभ्यासपूर्ण मांडणी
उद्घाटनानंतर विविध बौद्धिक व मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खालील प्रमुख विषयांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला:

भटके विमुक्तांच्या कार्यात परिषदेची भूमिका: प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांनी पहिल्या सत्रात भटके विमुक्त विकास परिषदेच्या ध्येय-धोरणांची आणि भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली.

आरोग्य व मानसिक ताणतणाव व्यवस्थापन: तुळजापूर येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. कार्तिक यादव यांनी बदलती जीवनशैली, उत्तम आरोग्य आणि कामाचा ताणतणाव व्यवस्थापित करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सेवा कार्य व बेघर मुलांचे शिक्षण: वसई (मुंबई) येथील श्री. मेहता यांनी दृकश्राव्य (व्हिडिओ) माध्यमाद्वारे बेघर मुलांच्या शिक्षणाविषयी आणि एकूणच सेवा कार्यातील आव्हानांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली.

इतिहास आणि देशभक्तीची प्रेरणा: दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 'सकाळ'चे सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धराम पाटील यांनी बंकिमचंद्र चटर्जी, स्वामी विवेकानंद आणि 'आनंदमठ' या कादंबरीचा संदर्भ देत, इंग्रजपूर्व व स्वातंत्र्यकाळातील इतिहासाचे विश्लेषण करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.

कार्यकर्त्यांची भूमिका व उत्तरदायित्व: जटवाडा (छत्रपती संभाजीनगर) येथील वामनराव देशपांडे यांनी संस्थेच्या विकासात कार्यकर्त्यांची भूमिका किती जबाबदारीची असते, हे सांगतानाच विद्यार्थ्यांसमोर स्वतःचा आदर्श कसा ठेवावा, यावर मार्गदर्शन केले.

आदर्श वसतिगृह व्यवस्थापन: बीड जिल्ह्यातील डोंगरी येथील अश्विन भोंडवे यांनी प्रात्यक्षिकांद्वारे वसतिगृहातील मुला-मुलींच्या समस्या, त्यांचे समुपदेशन आणि आदर्श व्यवस्थापन कसे असावे, याचे तंत्र समजावून सांगितले.

समारोप आणि आवाहन
प्रशिक्षण वर्गाचा समारोप करताना संघटन मंत्री राहुल चव्हाण यांनी प्रत्यक्ष खेळ आणि विविध कृतींच्या माध्यमातून 'ताणतणावमुक्त काम' कशा पद्धतीने करावे, याचे प्रात्यक्षिक घेतले.

"यमगरवाडी हे भटके विमुक्तांच्या शैक्षणिक प्रगतीचे मुख्य केंद्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचा आमचा मानस असून, सर्व कर्मचाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रशिक्षण वर्गाचे उत्तम सुत्रसंचलन हरीश मगदूम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अण्णासाहेब मगर यांनी केले, तर अण्णासाहेब कोल्हटकर यांनी उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशवंत निंबाळकर यांनी गीतगायन केले.

या प्रसंगी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे, कार्यवाहक विवेक अयाचित, संचालक अशोक संकलेचा, संघटन मंत्री राहुल चव्हाण, डॉ. प्रणिता गडेकर, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगंतुक सर्व तज्ज्ञ वक्त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments