धाराशिव : जिल्ह्यात 2023 पासून राबवण्यात येत असलेल्या _गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार_ योजनेत मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेने केला आहे. कागदोपत्रीच गाळ काढून दाखवून हेक्टरी 37,500 रुपये अनुदान उचलल्याचा आरोप करत शिवसेनेचे ॲड. उदयसिंह भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे की, परंडा, भूम, वाशी, उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि लोहारा या 7 तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात गाळ न टाकताच मोजमाप पुस्तिकांवर सह्या करून कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले.
योजनेसाठी ग्रामसेवक-तलाठी यांचा पंचनामा करणे आणि अवनी ॲपवर माहिती भरणे बंधनकारक असताना तसे केले गेले नाही. तसेच शासनाच्या जीआरनुसार अशासकीय संस्थांना दिलेले प्रशिक्षणही दिले गेले नसल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते, असा दावा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी गाळ न टाकताही त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि अपात्र शेतकऱ्यांकडून अनुदान वसूल करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
चौकशी न झाल्यास 15 जुलै 2026 रोजी तुळजापूर येथील मृद व जलसंधारण कार्यालयासमोर शिवसेना कार्यकर्ते अमरण उपोषण करतील, असा इशाराही ॲड. भोसले यांनी दिला आहे
0 Comments