धाराशिव शहरात मॉडिफाईड सायलेंसरचा धुमाकूळ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, RTO कडे कारवाईची मागणी
धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांवरून सुसाट वेगाने जाणाऱ्या आणि सायलेन्सर बदलून अथवा काढून कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे व हुल्लडबाजीमुळे ज्येष्ठ नागरिक, बालके आणि आजारी व्यक्तींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या उपद्रवी दुचाकीस्वारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स’ (फूक) या संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), धाराशिव यांना आज (४ ऑगस्ट) निवेदन देण्यात आले.
विमानासारखा आवाज आणि विना-नंबरप्लेट गाड्या!
मागील चार ते सहा महिन्यांपासून शहरात हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील काही अतताई युवकांनी आपल्या दुचाकींचे सायलेंसर मॉडिफाय (बदलून) केले आहेत, तर काहींनी थेट सायलेंसरच काढून टाकले आहेत. काही विदेशी कंपन्यांच्या महागड्या दुचाकींचा आवाज तर रस्तावरून विमान चालल्यासारखा येतो. इतकेच नव्हे, तर अशा कर्कश आवाज करणाऱ्या बहुतांश गाड्यांवर नंबरप्लेटसुद्धा नसतात, ज्यामुळे पोलिसांचा किंवा आरटीओ प्रशासनाचा धाक उरलेला नाही.
आरोग्यावर गंभीर परिणाम; लहान मुले, वृद्ध घाबरले!
शासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या या गाड्यांमुळे शहरात भीषण ध्वनिप्रदूषण होत आहे. रस्त्यावरून चालताना अचानक येणाऱ्या या प्रचंड आवाजामुळे:
वृद्ध आणि आजारी नागरिक घाबरून रस्त्याच्या बाजूला कोलमडून पडत आहेत.
लहान बालके प्रचंड भयभीत होत आहेत.
डॉक्टरांच्या मते अशा अति-कर्कश आवाजामुळे नागरिकांच्या कानाचे पडदे फाटण्याची आणि ऐकण्याची क्षमता कायमची गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.
'विशेष पथक तैनात करा'; नागरिकांची मागणी
प्रशासन स्वतःहून यावर लक्ष देईल या अपेक्षेने आजवर शांत राहिल्यानंतर, आता समस्येची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांनी आरटीओ कार्यालयाचे दरवाजे ठोकले आहेत.
निवेदनातील मुख्य मागण्या:
१. आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली विशेष पथक स्थापन करण्यात यावे.
२. शहरातील मुख्य रस्त्यांवर किमान एक महिन्यासाठी हे विशेष पथक जागोजागी तैनात राहावे.
३. नियम मोडणाऱ्या, सायलेंसर बदलणाऱ्या व विना-नंबरप्लेट गाड्यांवर कडक दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
निवेदन देतेवेळी फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स चे अध्यक्ष धर्मवीर कदम, उपाध्यक्ष शहाजीउद्दीन शेख, सचिव श्रीहरी लोखंडे यांच्यासह श्रीहरी मोरे, मुस्तफा बारूद, सिकंदर पटेल, तांबोळी जी. डी., अर्जुन जाधव, गायकवाड व्ही. के., बिलाल रंगरेज, सुरेश शेळके, मुद्दसीर शेख आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments