Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धनंजय ( भैय्या ) रणदिवे एक लढवय्या पत्रकार

भैरवनाथ कानडे/चिकुंद्रा
लोकशक्तीला विधायक वळण देणारा हरहुन्नरी पत्रकार म्हणून  अपेक्षित वर्तन बदलांसाठी  आपल्या सिद्धहस्त लेखणीतून समाज जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारा एक लढवय्या पत्रकार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक धनंजय श्रीमंतराव रणदिवे यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा शब्दातीत आलेख.....!

कर्तृत्वसंपन्न पुरुषांना जन्माला घालण्याचे भाग्य लाभलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा ( बु.) या गावाने असंच एक प्रतिभासंपन्न लेणं वृत्तपत्रसृष्टीला दिलं. वारकरी सांप्रदायिकतेची किनार लाभलेल्या सुसंस्कारित अशा शेतकरी कुटुंबात जडण घडण झालेल्या धनंजय भैय्या रणदिवे यांच्या बालमनाला तिथेच तर नव्या विचाराचे कोंदण आणि निस्पृहतेचा  गंध प्राप्त झाला. खडतर परिश्रम, दृढ इच्छाशक्ती जाज्वल आत्मविश्वास व स्वतःच्या क्षमतांवर प्रचंड विश्वास आणि उद्याच्या स्वप्नांना पाहण्याची दृष्टी यातूनच त्यांच्यातील निर्भीड पत्रकारितेचा अस्सल बाज उदयास आला. जिदद , चिकाटीची बीजं त्यांच्या मनात रुजली आणि सत्यासाठी प्रतिकूल परिस्थितीला प्रतिबंध न मानता सतत संघर्ष करीत त्यांची परिपक्व विचार प्रतिभा ही शब्दांवर स्वार झाली. 

पत्रकारितेशी त्यांनी अधिक नातं घट्ट करीत समाजाच्या निकोप वाढीसाठी त्यांनी पत्रकारितेचं शिवधनुष्य पेललं आहे .बदलत्या काळाची पाऊले ओळखून केवळ शब्दाच्या फुलोर्‍यात आणि कल्पनेच्या विश्वात न रमता आपला लेखन-प्रपंच अधिक वास्तववादी करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. दरम्यानच्या काळात वृत्तपत्रसृष्टीचा महाराजा दैनिक पुण्यनगरी सारख्या वृत्तपत्र समूहातील संधी क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले. परखड वक्ता ते शैलीदार लेखक म्हणून ते सर्वपरिचित आहेत . वारकरी संप्रदायातील संतांनी, समाजसुधारकांच्या वैचारिक सुसंस्कारित अशा वैभवशाली महाराष्ट्राच्या जडणघडणीत पत्रकारितेने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पत्रकारिता परमोधर्म मानून तो वसा त्यांनी घेतला.मानवी जात ,मानवता धर्म आणि गतिमान पत्रकारितेतून समाज परिवर्तन यासंबंधीची बांधीलकी धनंजय भैय्या रणदिवे यांच्या कार्यात प्रतिबिंबित झाली आहे.पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानची स्थापना करून  वडिलांच्या वैचारिक वारशाची साक्ष देत  त्यांनी आपल्यातील श्रीमंत मनाचे पुण्यशील दर्शन घडविले आहे. संतांनी सांगितलेली अध्यात्मिक लोकशाही, सामाजिक , भौतिक विकासाचा नवा अनुबंध निर्माण करीत श्रीमान रणदिवे यांनी पत्रकारिता,सामाजिक,राजकिय, शेती, सहकार क्षेत्रात संवेदनशील वृत्तीने लिलया संचार करीत या हरहुन्नरी पत्रकाराने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रबोधनाचे एक नवे पर्व उभारले .ज्याला खऱ्या अर्थाने समाजाच्या समृद्धीचा ध्यास आहे अशा नेतृत्वाचे एक पाऊल समाजाच्या पुढे तर दुसरे पाऊल समाजाच्या बरोबर असणे आवश्यक असते ,समाजाच्या पुढे एक पाऊल असल्यामुळे प्रगतीचे वेध घेता येतात आणि दुसरे पाऊल समाजाबरोबर असल्यामुळे समाज बरोबर येतो .ही किमया साधलेल्या धनंजय ( भैय्या ) रणदिवे यांनी पत्रकारिता समाजकारण व राजकारण यामध्ये समन्वय साधला म्हणून की काय त्यांचे शब्दसामर्थ्य लोकांच्या आज पसंतीस उतरले आहे ."तरी अवधान ऐकले देईजे ।मग सर्व सुखाशी पत्र घेईजे " असे संत ज्ञानेश्वरांनी  श्रोत्यांच्या अंतःकरणाच्या तारा छेडल्या आणि गीतेतलं गुढ, गहन असे तत्त्वज्ञान सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून सांगितलं.ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान ही कोणत्याही एका विशिष्ट वर्गाची बांधिलकी असू शकत नाही हा विचार पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या पुढे धनंजय रणदिवे यांनी ठेवला.अर्थातच त्यांच्या अक्षर वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या संत साहित्याचा व भक्ती सांप्रदायाचा मोठा वाटा आहे. जिल्ह्याच्या शाश्वत व लोकाभिमुख विकासासाठी एक व्यासंगी पत्रकार म्हणून जिल्ह्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व पायाभूत संचितावर भर देत जिल्ह्याच्या राजकारणाला त्यांनी नवे मूल्य देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्ह्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कृषी, , सहकार, , शिक्षण, सिंचन शेती, क्षेत्रासह रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक त्या योजना व नवनवे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठीची आग्रही भूमिका वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी मांडली आहे. लोकशाहीतील वृत्तपत्राचे श्रेष्ठत्व जनसामान्यांच्या गळी उतरविण्याचे कार्य विविध धार्मिक, सामाजिक व कार्यक्रमातून धनंजय रणदिवे यांनी आजतागायत केले आहे.तर दुसरीकडे चंगळवादाची शिकार बनलेल्या नीतिभ्रष्ट व दुसऱ्याचे शोषण करून राजविलास भोगणाऱ्या, आत्मिक सुखाने अतृप्त  समाजाला चिरंतन नैतिक मूल्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखणीतून विशद केले आहे. ग्रामीण जीवनाची प्रगल्भ जाण असल्याने शेतकरी , कामगार , दलित, वंचितांच्या उत्थानासाठी सार्वजनिक प्रश्नावर सडेतोड भाष्य करणे हा  यांच्या पत्रकारितेचा मूळ पिंड आहे.लोकशाही मुल्ये संवर्धनाबरोबरच पत्रकारितेच्या परिघाबाहेर जाऊन वेगळ्या भूमिकेतलं जीवन जगू पाहणाऱ्या या संघर्षयात्रीने शासन दरबारी पाठपुरावा करत सारोळा (बु) सह  पंचक्रोशीत विविध विकासकामांची पायाभरणी केली. रस्ते , वीज, , , शेती सह पूरक अशा गावातील भौतिक सुविधांची उपलब्धी करून देण्यावर त्यांनी भर दिला. 

आपल्या अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे लोकमानसात त्यांची सर्वदूर ओळख व दांडगा लोकसंपर्क हे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे द्योतक आहे.संत , सज्जनाच्या  मुशीत तयार झालेल्या या व्यक्तित्वाला पत्रकारितेची व ध्येयप्रवणतेची प्रेरणा ही पुण्यनगरी परिवारातून मिळाली.  खरे पाहता त्यांचा हा रचनात्मक संघर्ष होता, तो उमद्या पत्रकार  व युवा वर्गांना तो प्रेरणादायी व पथदर्शी ठरणारा प्रवास आहे . तो आज अनेकांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण प्रश्‍नाबाबतची त्यांची तळमळ ही जनहिताची काळजी घेणारी आहे. समाजसेवेसह व्रतस्थ पत्रकारितेबरोबर  राजकीय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले आणि समाजकारण व राजकारणाचा एक नवा जोडबंद निर्माण केला . आजतागायत उस्मानाबाद सारख्या दुष्काळी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एक यशस्वी पत्रकार एवढीच मर्यादित त्यांची ओळख नाही तर पत्रकारिता,  , समाजकारण, क्रीडा शेती , आदी क्षेत्राच्या कार्यातील परिशीलनता त्यामागील भूमिका व त्यांच्या प्रयोग प्रयत्नांच मोल तितकच मोठं आहे. शून्य ते शिखर असा त्यांचा लोकविलक्षण प्रवास हा खऱ्या अर्थाने त्यांच्या विस्तृत कार्याची जाणीव करून देणारा असल्याने त्यांचा भविष्यकाळ उज्वल व तितकाच आश्वासक आहे .जिल्हा विकासात अडसर ठरणार्‍या विविधांगी प्रश्नांना थेट भिडणं आणि तितक्याच प्रखरपणे मांडणे,  त्याचे विश्लेषण करणे यातील त्यांची हातोटी व चिकाटी आणि सचोटी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. प्रसंगी रस्त्यावर आंदोलनात उतरून , परखड मत व्यक्त करून तर कधी लोकचळवळ उभी करून प्रत्येक प्रश्न धसास लावण्याची त्यांची धडाकेबाज कार्यशैली ही न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अनेकांना बळ पुरविणारी आहे .त्यांची शोधपत्रिका कधी भ्रष्टाचारावर प्रहार करते तर कधी अन्यायाच्या विरोधात बंड पुकारते.जेव्हा जेव्हा समाज मनाचा तोल ढासळतो, तत्त्वांना ग्लानी येते , नितीचा विपर्यास होतो तेव्हा तेव्हा त्यांची परखड व तितकीच लोकाभिमुख अशी  लेखणी सुज्ञ वाचकमनाचा ठाव घेते . मराठी पत्रकारितेचा अविभाज्य भाग होते. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मराठवाड्यातील कर्तृत्वसंपन्न पत्रकारांच्या कार्याचा महाराष्ट्रातील दिग्गज मुख्यमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते उचित गौरव करून उपेक्षित पत्रकारांमध्ये आत्मसन्मान जागविला आहे . क्रिडा विभागात विविध पदांवर कार्यरत राहुन त्यांनी जिल्ह्यातीलउमद्या मनाच्या खेळाडूंना नवनवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. , सामाजिक, धार्मिक ,सांस्कृतिक स्वरुपाच्या विविधांगी कार्यक्रमातून त्यांनी लोकमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.एक लढवय्या पत्रकार ते जनसामान्यांचे आश्वासक नेतृत्व. असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व दिवसेंदिवस बहरताना दिसत आहे. धोपट मार्ग सोडून वेगळी पायवाट तुडवीत ध्येयपुर्तीकडे वाटचाल करणाऱ्या त्यांच्या कार्य कर्तृत्वाकडे  निरखून पाहिल्यानंतर" असाध्य ते साध्य, करिता सायास " या संत तुकारामांच्या तत्वज्ञानाची अनुभूती येते. कारण संघर्ष जितका मोठा तितका भविष्यकाळ उज्वल असतो .प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत अथक परिश्रम व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आपला जीवनग्रंथ समृद्ध करणारे आमचे मार्गदर्शक धनंजय भैय्या रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


      - भैरवनाथ  कानडे
            चिकुंद्रा
       9860344073

Post a Comment

0 Comments