तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी मोठ्या उत्साहात 'बाल आनंद मेळावा' संपन्न झाला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या 60 पेक्षा अधिक स्टॉल्सनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. केवळ खाऊची मजाच नाही, तर प्रत्यक्ष खरेदी-विक्रीतून विद्यार्थ्यांनी व्यवहाराचे धडे गिरवले. विशेष म्हणजे, अवघ्या काही तासांत या मेळाव्यात तब्बल 25 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
दिमाखदार उद्घाटन
मेळाव्याचे उद्घाटन नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय वाले साहेब, गावच्या सरपंच सौ. वर्षाराणी संतोष वडणे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले.
विविधतेने नटलेले स्टॉल्स
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी एकूण 60 स्टॉल्स लावले होते. यात प्रामुख्याने चिमुकल्यांनी लावलेल्या स्टॉल मध्ये खाद्यपदार्थ चटपटीत भेळ,पाणीपुरी,घरगुती पौष्टिक पदार्थ, तर शेतातून आणलेला ताजा हिरवा भाजीपाला, स्टेशनरी शैक्षणिक साहित्य आणि खेळणी आदी स्टॉल लावण्यात आले होते.
ग्रामस्थांनी आणि विशेषतः महिलांनी या मेळाव्याला उदंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांकडून वस्तूंची खरेदी केली. मुलांनी स्वतः हिशोब ठेवणे, गिऱ्हाइकांशी बोलणे आणि वस्तूंचे मार्केटिंग करणे यातून आत्मविश्वासाचे दर्शन घडवले.
यांचे लाभले सहकार्य
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक इर्शाद शेख, सहशिक्षक श्री. बालाजी दंडनाईक, श्री. पोपट सुरवसे, श्री. विठ्ठल गावित आणि सहशिक्षिका सौ.मनिषा जाधव मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य रुजवण्यासाठी असे उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरतात
--मुख्याध्यापक इर्शाद शेख
"केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाची ओळख व्हावी, हा या बाल आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने यात सहभाग घेतला. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य रुजवण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतात. ग्रामस्थांच्या प्रतिसादाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे."
— इर्शाद शेख
(मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, कुंभारी)
0 Comments