काटी/उमाजी गायकवाड
"जेवढी भूक तेवढेच अन्न खाणे ही प्रकृती, तर अन्नाचा कण न् कण वाचवून भुकेल्याला घास देणे हीच खरी संस्कृती," हा मोलाचा संदेश देत तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात सातवीच्या विद्यार्थ्यांनी 'बाल आनंदोत्सव' साजरा केला.
मराठी पाठ्यपुस्तकातील 'वदनी कवळ घेता' या पाठाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्नाचे महत्त्व पटवून दिले. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, विद्यार्थ्यांनी स्वतः पोहे तयार करून शाळेतील सुमारे 80 विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्याचा आस्वाद दिला.
यावेळी विद्यार्थिनी श्रुती नवगिरे हिने आपल्या मनोगतातून "अन्न वाया घालवू नका" असा कळकळीचा संदेश दिला. या उपक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री. महादेव माळी यांनी केले होते. कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. महादेव मसुते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाठ्यपुस्तकातील धडा प्रत्यक्ष जीवनात उतरवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अन्नाची नासाडी टाळण्याची ही शिकवण त्यांना भविष्यात एक जबाबदार नागरिक बनवेल
--मुख्याध्यापक सुहास वडणे
"केवळ वर्गात धडे शिकवून संस्कार होत नाहीत, तर ते अनुभवातून द्यावे लागतात. आमच्या विद्यार्थ्यांनी आज स्वतः राबून आणि वाढून 'अन्न हे पूर्णब्रह्म' असल्याचा संस्कार घेतला आहे. अन्नाची नासाडी टाळण्याची ही शिकवण त्यांना भविष्यात एक जबाबदार नागरिक बनवेल, याचा मला सार्थ अभिमान आहे."
— सुहास वडणे
(मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय, तामलवाडी)
0 Comments