धाराशिव: "सामान्य माणसाच्या हाकेला ओ देणारे आणि अडीअडचणीत खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे नेतृत्वच गावाचा विकास करू शकते. त्यामुळे सत्तेची पर्वा न करता जनतेशी नाळ जपणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा," असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केले.
येडशी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दुधगाव आणि जवळे (दु.) येथे आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गर्दी करत उमेदवारांचे स्वागत केले.
हे आहेत महाविकास आघाडीचे शिलेदार
येडशी जिल्हा परिषद गटातून देवदत्त भागवत मोरे, येडशी पंचायत समिती गणातून नलावडे निता गजानन आणि कसबे तडवळे पंचायत समिती गणातून मनके बालाजी अंबऋषी हे निवडणूक रिंगणात आहेत.
'ही' आहे उमेदवारांची ओळख
उमेदवारांच्या कार्याचा गौरव करताना आमदार पाटील म्हणाले की, "गावातील पाणीप्रश्न असो वा शेतकऱ्यांच्या व्यथा, हे उमेदवार प्रशासनाशी लढा देऊन प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. सत्ता नसतानाही समाजकार्याची धुरा सांभाळणारी ही मंडळी आहेत."
आजच्या काळात संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असून, हे उमेदवार केवळ निवडणुकीपुरते नसून सुख-दु:खात धावून येणारे आहेत. सत्ता नसतानाही ज्यांनी पाणीप्रश्न, शेती आणि कष्टकऱ्यांच्या समस्यांसाठी संघर्ष केला, त्या 'मशाल' हाती घेतलेल्या शिलेदारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.
या प्रचारसभेस स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments