काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील 'एकलव्य विद्या संकुल' येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ अत्यंत उत्साही व भावूक वातावरणात पार पडला. शालेय जीवनातील शिस्त आणि व्यवस्थापनाचा अनुभव देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेचा गाडा यशस्वीपणे हाकलला.
विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा
स्वयंशासन दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी योगेश पवार आणि सार्थक मालकर या विद्यार्थ्यांनी सांभाळली. दिवसभर शालेय अध्यापनापासून ते वसतिगृहाच्या व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे दहावीच्या ५२ मुला-मुलींनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.
कृतज्ञता आणि शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित सभेत स्वप्नील बंडगर, सृष्टी कोळी, आदिती सुपलकर, प्राची पाटोळे, अजित पाखरे आणि स्वानंद कोल्हटकर या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
मार्गदर्शन: प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत: मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले. सहशिक्षक अण्णासाहेब मगर यांनीही आपले विचार मांडले.
शाळेला 'साऊंड बॉक्स'ची भेट
आपल्या लाडक्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला 'साऊंड बॉक्स' भेट दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता भोजने व रूपाली गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष बनसोडे सर यांनी केले. याप्रसंगी गोविंद सोमानी, सुमन सोमानी, फुलाजी ताटी कुंडलवार, बाळाजी क्षीरसागर, नवनाथ बिराजदार, अनिल घुगे, अशोक बनकर यांसह सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments