धाराशिव | Only न्युज धाराशिव
शिवकालीन इतिहासाचा वारसा जतन करणाऱ्या आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या 'बावन बुरजी (करवंड) बचाव कृती समिती'च्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते दिलीप जनार्धन मलपे (इसबावी) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव
दिलीप मलपे हे गेल्या अनेक वर्षांपासून 'विश्वक्रांती सामाजिक संस्था' तसेच मालवाहतूक व रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. रिक्षाचालक आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. रक्तदान शिबिरे, उन्हाळ्यात मोफत पाणपोई, गरजू कुटुंबांना अन्नधान्य व औषधोपचार पुरवणे अशा उपक्रमांतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
काय आहे 'करवंड' महोत्सवाचा इतिहास?
१५ एप्रिल १६५७ रोजी करवंड येथील शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई इंगळे यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी रायगडावर संपन्न झाला होता. गुणवंताबाई या शिवरायांच्या आठव्या पत्नी. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून 'बावन बुरजी बचाव कृती समिती'च्या वतीने दरवर्षी 'करवंड महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा महोत्सव केवळ उत्सव नसून इतिहास, संस्कृती आणि सामाजिक एकीचा संगम मानला जातो.
नूतन अध्यक्षांचा संकल्प
निवडीनंतर आपली भूमिका मांडताना दिलीप मलपे म्हणाले की,"पंढरपूर तालुक्यातील गावोगावी १५ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून 'शिवविवाह स्मृती सोहळे' आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. या माध्यमातून शिवकालीन वारसा जतन करणे, युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवणे आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू."
दिग्गजांकडून अभिनंदन
मलपे यांच्या निवडीबद्दल सुनीलराव जवंजाळ पाटील, हरी रुद्र राजे इंगळे, विद्याधर महाले साहेब, अविनाश बापू देशमुख, अण्णासाहेब म्हळसने, ॲड. ए.टी. (नाना) देशमुख यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मलपे यांच्या नियुक्तीमुळे या चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0 Comments