"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ मधील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित 'भारत टॅलेंट सर्च' परीक्षा रविवारी (दि. २९) चव्हाणवाडी येथे उत्साहात पार पडली. तुळजापूर तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १६० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदवला.
एज्युमेट अकादमीच्या वतीने दरवर्षी ही परीक्षा राज्यभरात एकाच वेळी घेतली जाते. या परीक्षेचे मुख्य आकर्षण म्हणजे, राज्य व जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' (ISRO) येथे शैक्षणिक सहलीसाठी नेले जाते. याच प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पेपर सोडवला.
जि. प. प्राथमिक शाळा चव्हाणवाडी येथे या परीक्षेचे केंद्र होते. परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून तालुका समन्वयक श्री. विकास ढंगे यांनी नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. तर पर्यवेक्षक म्हणून श्री. निकाळजे सर, श्री. सिराज शेख आणि श्रीमती नीता माने यांनी काम पाहिले.
केवळ घोकंपट्टीपेक्षा जीवनाभिमुख शिक्षण आणि तार्किक विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांमधून आणि शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.
0 Comments