Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेती पिके गंभीर संकटात सापडली आहेत. विशेषतः ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यात असलेल्या सोयाबीन तसेच नव्याने लागवड केलेल्या कांदा पिकाला या पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसत आहे. पावसाचा पत्ता नसल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून पिके पाण्याच्या ताणाखाली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, सिंचनाची सोय नसतानाही शास्त्रीय उपायांचा वापर करून पिकांचे होणारे संभाव्य नुकसान कसे टाळावे, याबाबत काटी कृषी मंडळाचे अधिकारी ए. एम. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शन व तातडीचे आवाहन केले आहे.
१. सोयाबीन पिकासाठी 'ताण व्यवस्थापन' उपाय
पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे सोयाबीनच्या पानांमधून बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि झाड सुकू लागते. हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील फवारण्या व मशागतीची कामे त्वरित करावीत:
पोटॅशियम नायट्रेट (13:0:45) ची फवारणी:
प्रमाण: १ किलो प्रति १०० लिटर पाणी (१५ लिटरच्या पंपासाठी १०० ग्रॅम).
फायदा: या खतामुळे वनस्पतीची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. तसेच फुलोरा व शेंगा गळण्यापासून संरक्षण होते.
विद्राव्य खत (0:52:34) फवारणी:
सोयाबीन सध्या फुलोऱ्यात किंवा शेंगा धरण्याच्या संवेदनशील अवस्थेत असल्यास, १ किलो 0:52:34 प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून (पंपाला १०० ग्रॅम) फवारणी करावी.
अँटी-ट्रांसपायरंट व सिलिकॉन स्टिकरचा वापर:
बाजारपेठेत मिळणारे सिलिकॉन बेस स्टिकर (Spreader) फवारणीत वापरल्यास पानांवरील बाष्पीभवनाचा वेग मंदावतो आणि झाडातील ओलावा टिकून राहतो.
धूळ-मुलचिंग (झाकून कोळपणी):
शेतात हलकी व आच्छादक कोळपणी करून जमिनीच्या वरच्या थराची माती बारीक करावी. या ‘धूळ-मुलचिंग’मुळे जमिनीतील सुक्ष्म छिद्रे बुजली जाऊन ओल उडून जाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
किड-रोग नियंत्रण:
पाण्याच्या ताणामुळे सोयाबीनवर पांढरी माशी, तुडतुडे किंवा अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. यासाठी गरजेनुसारच हलक्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
२. कांदा पिकाचे रक्षण व अन्नद्रव्य व्यवस्थापन
वाढती उष्णता आणि पावसाची तुटवडा यामुळे कांद्याच्या रोपांवर व लागवड केलेल्या पिकावर गंभीर परिणाम होत आहे.
अन्नद्रव्यांची फवारणी:
पाण्याच्या कमतरतेमुळे कांद्याची पात पिवळी पडू लागल्यास, 19:19:19 किंवा 13:0:45 हे विद्राव्य खत पंपाला ८० ते १०० ग्रॅम घेऊन पानांवर फवारणी करावी. यामुळे पिकाला तातडीने पोषण मिळते.
थ्रिप्स (फुलकिडे) व करपा रोगावर मात:
कोरड्या हवामानात कांद्यावर थ्रिप्स आणि तांबड्या/पिवळ्या करप्याचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो.
थ्रिप्ससाठी: फिप्रोनिल ५% SC (२० मिली) किंवा थियामेथॉक्सम (५ ग्रॅम) प्रति १५ लिटर पंपात मिसळावे.
करप्यासाठी: मँकोझेब/साफ किंवा टेब्युकोनॅझोल (२५-३० ग्रॅम) हे बुरशीनाशक सोबत वापरावे.
सिलिकॉनयुक्त स्टिकर अनिवार्य:
कांद्याच्या पानावरील मेणचट थरामुळे औषध टिकून राहत नाही. त्यामुळे फवारणीत ५ मिली प्रति पंप चांगल्या प्रतीचे सिलिकॉन स्टिकर अवश्य वापरावे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी ‘गोल्डन टिप्स’
फवारणीची योग्य वेळ: कडक उन्हामध्ये फवारणी केल्यास पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फवारणीची कामे सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतरच करावीत.
युरियाचा थेट वापर टाळा: कोरड्या हवामानात आणि जमिनीत ओलावा नसताना युरिया किंवा दाणेदार खतांचा थेट डोस देणे पूर्णपणे टाळावे. ओलावा नसल्यास युरिया पिकाला जाळून टाकू शकतो.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल: पिकाची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी मुख्य खतांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची (Micro-nutrients) फवारणी अत्यंत फायदेशीर ठरते.
"हवामानातील बदलांमुळे पावसाचा खंड वाढला असला, तरी योग्य वेळी शास्त्रीय आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना केल्यास सोयाबीन व कांदा पिकाचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर टाळता येणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात."
— ए. एम. पाटील (कृषी मंडळ अधिकारी, काटी)
0 Comments