Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🔥“धाराशिवमध्ये गुटखाविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा; ‘कारवाई नाही तर उग्र लढा’ – प्रशासनाला दिला अल्टिमेटम!”

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
धाराशिव | प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या गुटख्याच्या अवैध वाहतूक आणि विक्रीविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक झाली असून, आज (दि. 30 मार्च) अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला.

सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर आणि जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

आंदोलनादरम्यान तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. शासनाने बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी खुलेआम विक्री सुरू असल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेले गुटख्याचे व्यसन समाजासाठी धोकादायक ठरत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. गुटख्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत “गुटखा बंदी फक्त कागदावरच आहे का?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला.

संघटनेने प्रशासनाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. बाहेरून येणारा गुटखा तात्काळ रोखावा, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोपही करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांवर तात्काळ धाडी व जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. संबंधित पत्रावर अधिकारी प. द. इंबडे यांची स्वाक्षरी असून कारवाईला प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी “ठोस कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला असून, समाजाच्या आरोग्याच्या प्रश्नावर उभा राहिलेला हा आवाज प्रशासनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

एकूणच, धाराशिवमध्ये गुटखाबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments