"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
"हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांच्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचे पाप करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पुसून टाकू पाहणाऱ्या हुकूमशाही भाजप सरकारला आता 'चले जाव' म्हणण्याची वेळ आली आहे," असा घणाघाती प्रहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सुरतगाव येथून निघालेल्या भव्य 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रे'चा समारोप आज सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालय येथे एका विराट जाहीर सभेने झाला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
भाजपला महापुरुषांची नावे पुसायची आहेत: हर्षवर्धन सपकाळ
सभेला संबोधित करताना सपकाळ म्हणाले की, "भाजपला केवळ काँग्रेसच नाही, तर अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, विलासराव देशमुख, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नावही पुसून टाकायचे आहे. १५ लाख रुपये आणि नोकऱ्यांच्या खोट्या घोषणा देऊन जनतेला फसवले गेले. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारून सर्व योजना गुजरातला पळवल्या जात आहेत. 'घालीन लोटांगण' म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान वागत असून त्यांनी देशाचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे." संतोष देशमुख हत्याकांड आणि भोंदू बाबा खरातवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर तीव्र ताशेरे ओढले.
पाटील पिता-पुत्रांनी जिल्ह्याला भकास केले: ॲड. धिरज पाटील
जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांनी स्थानिक प्रश्नांवरून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "स्वतःला पीक विमा स्पेशालिस्ट म्हणवून घेणाऱ्यांना अद्याप २०२० चा विमा मिळवून देता आला नाही. २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. ४० वर्षे सत्ता हाती असतानाही पाटील पिता-पुत्रांनी धाराशिव जिल्ह्याला भकास केले. रोजगार हमी सारख्या काँग्रेसच्या योजना बंद करून हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे."
चुकीच्या हातातील सत्ता बदला: हणमंतराव पवार
काँग्रेस प्रवक्ते हणमंतराव पवार यांनी तुळजापूरच्या राजकीय वारशाची आठवण करून दिली. "ज्या तालुक्याचे नेतृत्व माणिकराव खपले, मधुकरराव चव्हाण, नरेंद्र बोरगांवकर आणि आलुरे गुरुजींसारख्या दिग्गजांनी केले, तिथे आज चुकीच्या व्यक्तीच्या हाती सत्ता आहे. गॅस आणि पेट्रोलच्या रांगेत माता-भगिनींना उभे करून लाडक्या बहिणीला स्वतःच्या खिशातील पैसे दिल्यासारखा आव 'भामटे भाऊ' आणत आहेत. शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलेल्या आहे. निघून गेलेल्या गद्दारांना
आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले.
शेतकरी संघर्ष न्याय यात्रेतील सांगता सभेतील प्रमुख मुद्दे:
सावध राहा: भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांपासून सावध राहण्याचे आवाहन.
जमीन प्रश्न: सर्व जमिनी 'वर्ग १' मध्ये करण्याची मागणी.
स्मार्ट मीटर: सक्तीने बसवले जाणारे स्मार्ट मीटर आणि अनियमित वीज पुरवठ्याचा निषेध.
लोकशाही रक्षण: संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन.
या सभेला जिल्हभरातील शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "या सरकारला खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'.
0 Comments