"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
पारंपरिक शेतीला जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर मातीतून खरोखरच सोनं उगवता येतं, हे धाराशिव जिल्ह्यातील काटी गावच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी बाळासाहेब श्रीमंत गुंड यांनी चक्क 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाच्या उत्पादनात मोठी क्रांती घडवली असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या या प्रयोगाची चर्चा रंगली आहे.
उत्पादनात दुपटीने वाढ, खर्चही घटला
सामान्यतः पारंपरिक पद्धतीने उसाचे पीक घेतल्यास एकरी ४० ते ५० टनांपर्यंत उत्पादन मिळते. मात्र, बाळासाहेब गुंड यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे गणित पूर्णपणे बदलून टाकले आहे. त्यांनी आपल्या शेतात प्रति एकरी तब्बल १०३ टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे, एका उसाचे वजन सरासरी साडेतीन किलो भरले असून त्याला ४० ते ४२ कांड्या आहेत.
काय आहे हे 'एआय' तंत्रज्ञान?
बाळासाहेब गुंड यांनी आपल्या शेतात 'एआय' आधारित एक विशेष यंत्रणा बसवली आहे. या तंत्रज्ञानामुळे त्यांना खालील गोष्टींची अचूक माहिती थेट मोबाईलवर मिळते:
जमिनीतील ओलावा व आर्द्रता: पिकाला नेमकी कधी आणि किती पाण्याची गरज आहे, हे समजल्यामुळे पाण्याची मोठी बचत झाली.
अचूक खत व्यवस्थापन: जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून योग्य वेळी खते दिल्याने खतांवरील विनाकारण होणारा खर्च वाचला.
हवामान व रोग नियंत्रण: वातावरणातील बदल आणि पानांवरील दव यांचे अचूक अंदाज मिळाल्याने पिकावर रोग पडण्यापूर्वीच उपाययोजना करणे शक्य झाले.
असे आहे फायद्याचे गणित
गुंड यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'च्या '२६५' वाणााची लागवड केली होती.
एकूण खर्च: ९० हजार रुपये (रोप, खते, ठिबक सिंचन व मशागत).
एकूण उत्पन्न: बाजारभावानुसार साधारण ३ लाख १० हजार रुपये.
निव्वळ नफा: सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात २ लाख २० हजार रुपये इतका निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे.
"तंत्रज्ञानामुळे शेतीतील मानवी चुका कमी होतात आणि उत्पादनात शाश्वत वाढ मिळते. हवामानाचा अचूक अंदाज मिळाल्याने मोठे नुकसान टळले," असा विश्वास बाळासाहेब गुंड यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments