काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मागील दहा ते बारा दिवसांपासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. या हंगामात वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीपाची पेरणी मृग नक्षत्रात झाली होती.त्यामुळे बळीराजाही समाधानी होता. परंतु मागील बारा ते तेरा दिवसांपासून ढगाळ हवामान व सतत पावसाची संततधार सुरु असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. व सोयाबीन पिकाचे पाने पिवळी पडत आहेत. संततधार पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग पिकावर प्रामुख्याने रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. तसेच कांदा लागवडीसाठी लावलेली रोपे पाण्यात गेल्याने तिही वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालू हंगामात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच काटीसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत.
काटीसह परिसरात मागील बारा ते तेरा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते. मात्र 13 दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे. दररोजच पाऊस बरसत असल्याने काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे तूर, सोयाबीन पिवळी पडून वाढ खुंटल्याचे चित्र आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी कुठेकुठे जागीच थिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास शेतीचे कामे करता येतील अशी आशा शेतकरी बाळगून आहेत.
महसूल विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे
आठ किलो कांद्याचे बी टाकले होते. त्यामधील 50 टक्केही रोप राहिले नाही. 6 एकर मधील सोयाबीन अति व सततच्या पावसामुळे पिवळे पडले असून सोयाबीन पिक पाण्यात आहे. त्याच प्रमाणे गावच्या शिवारात पिकांची अशीच स्थिती आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे
--जयाजी देशमुख
शेतकरी काटी ता. तुळजापूर
संततधार पावसामुळे आंतर मशागतीला ब्रेक
परिसरात मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिमरिप सुरूच आहे.दररोजच पाऊस पडत असल्याने शेतातील आंतर मशागतीला ब्रेक लागला आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन, तुर, मुग,उडीद आदी पिके पिवळी पडत आहेत.
--रावसाहेब देशमुख, शेतकरी काटी
ता. तुळजापूर
शेतीची कामे ठप्प
संततधार पावसामुळे पिके पाण्यात असून परिसरात गत दहा ते बारा दिवसांपासून सतत रिमझीम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना अनेक ठिकाणी तलावाचे स्वरुप आल्याने मोठे नुकसान झाले आहे.
--राजु वाडकर
शेतकरी काटी ता.तुळजापूर
0 Comments